पंडित सामता प्रसाद
- Team TabBhiBola

- Oct 18, 2020
- 2 min read
Updated: Jan 29, 2021
अ} जन्म आणि प्रारंभिक शिक्षण :- पंडित सामता प्रसाद यांचा जन्म १९ जुलै १९२० रोजी बनारस घराण्याच्या प्रतप्पू महाराजांच्या वंशात झाला. त्यांनी आपले वडील पंडित बाचा मिश्र यांचेकडे तबला वादनाचे प्रारंभिक शिक्षण घेतले.
ब} प्रगत शिक्षण आणि रियाझ :- वडलांच्या अकस्मात निधनामुळे अनेक कठीण प्रसंगांना सामता प्रसाद यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्यांच्या तबलाशिक्षणामध्ये खंड पडला, त्यांना अनेक अडी-अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु या सर्व प्रसंगांवर मात करत त्यांनी आपले पुढील शिक्षण बनारस घराण्याचे महान तबलावादक विक्रमादित्य उर्फ बिक्कू महाराज यांचेकडे घेण्यास सुरवात केली. बनारस घराण्यातील कलाकारांना उमजलं होतं की अतिशय कठोर रियाझ करूनच तबल्यावर प्रभुत्व मिळवता येऊ शकते. पंडित सामता प्रसाद यांनी सुद्धा खूप कठोर आणि अविश्रांत रियाझ केला. १५-१६ वर्षांच्या कठोर मेहनतीमुळे त्यांनी आपल्या हातात आत्यंतिक गोडवा व चपळता निर्माण केली. अत्यंत सुंदर, स्पष्ट, वजनदार, गुंजयुक्त, सशक्त आणि सुरेल चाटी वादनाने ते रसिक-श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत. त्यांच्या बायाँ वरील घुमारा पण थोडा वेगळा होता. त्यातून एक विशिष्ट प्रकारची आस येत असे.
क} वादन वैशिष्टये :- अलाहाबाद विश्वविद्यालयातर्फे १९४२ साली अखिल भारतीय संगीत संमेलनात झालेल्या त्यांच्या अभूतपूर्व तबला वादनानंतर त्यांच्यावर देशाच्या कानाकोपऱ्यातून निमंत्रणांचा वर्षाव झाला. नृत्याच्या तसेच तंतुवाद्याच्या साथ-संगतीतही त्यांचा हातखंडा होता. खूप वरच्या लयीत सुद्धा सुस्पष्ट निकास आणि एकंदर तबलावादनाची आकर्षक मांडणी, ही त्यांच्या वादनाची खास वैशिष्ट्ये. बनारस घराण्याव्यतिरिक्त त्यांनी दिल्ली घराण्यांच्या कायद्यांवर प्रभुत्व मिळविले होते. श्रोत्यांसमोर अतिशय नजाकतपणे ते दिल्ली घराण्यांच्या कायद्यांचे प्रस्तुतीकरण करीत असत. दोन बोटांचा खूप रियाझ करूनच त्यांनी हे कौशल्य मिळवले होते. सितार, सरोद आणि नृत्याची साथ-संगत, याचबरोबर एकल तबला वादनही ते अतिशय कुशलतेने सादर करीत असत. अनेक लयींवर त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. स्वरमयी व नादमधुर वादनामुळेच अनेक संगीतकारांनीसुद्धा चित्रपट गीताच्या साथीसाठी त्यांना बोलावित असत.
ड} पुरस्कार आणि शिष्य परिवार :- त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यात 'ताल-शिरोमणी','ताल-मार्तंड', 'पदमश्री', 'पदमभूषण' हे महत्वाचे पुरस्कार आहेत. त्यांच्या शिष्य परिवारात जेरल मसी, नवकुमार पंडा, चंद्रकांत कामत, माणिक पोपटकर, वसंत पवार, पं. सुरेश तळवलकर, पं. सत्यनारायण वसिष्ठ, माणिकलाल दास, रमेश सावंत, त्यांचे सुपुत्र कुमार लाल व कैलास नाथ हे उल्लेखनीय आहेत.
इ} मृत्यू :- पं. सुरेश तळवलकर व शमा भाटे यांनी पुण्यात आयोजित केलेल्या कार्यशाळेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ३१ मे १९९४ रोजी त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

Comments